साने गुरुजींचे विचार आत्मसात करणे गरजेचे   

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे मत

पुणे : सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणार्‍या साने गुरुजींनी स्वतःला विसरुन समाजसेवा केली. त्यांचा सेवाभाव समजून घेण्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. साधी जीवनशैली आणि कार्यातून त्यांनी शिक्षक, पालक आणि कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला, असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले.  शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता बदल साने गुरुजींनी घडविले. पालकांनी विद्यार्थी कसा घडवावा, पालकांनी कसे वागावे, कार्यकर्त्यांनी आपली ओळख पुसून कार्य करावे हे गुरुजींच्या सेवाभावातून प्रकट होते, असे त्यांच्या जीवनकार्यातील विविध दाखले देऊन त्यांनी स्पष्ट केले. 
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रात ‘पालक, शिक्षक, कार्यकर्त्यांसाठी साने गुरुजी’ या विषयावर हेरंब कुलकर्णी बोलत होते.हेरंब कुलकर्णी म्हणाले, साने गुरुजींनी आपले संपूर्ण आयुष्य शैक्षणिक, सामाजिक कार्याबरोबर राष्ट्राच्या हितासाठी घालवले. विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांनी निसंकोचपणे काम केले. त्यांचे  ‘शामची आई’ हे पुस्तक ज्ञानेश्वरीप्रमाणे वाचले गेले आहे. शामच्या आईला जाऊन आज शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत, आजही त्यांचे विचार जीवंत आहे. श्यामच्या आईने आपल्या संस्कारातून घडविलेला गुरुजी तोच विचार त्यांनी समाजात पेरला. आपल्या आईनी घालून दिलेला संस्काराने ते पुढे गेले.
 
जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे एका विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. येथे त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच दिले नाही, तर स्वालंबन, सेवावृत्ती आणि नैतिक मूल्ये शिकविली. त्यांनी ‘छात्रालय’ नावाचे मासिक सुरू करुन तरुणांना देशभक्ती, नैतिकता आणि सामाजिक करण्यास प्रोत्साहित केले. त्याचबरोबर मासिकातून विद्यार्थ्यांना लेखन करण्यास प्रोत्साहीत केले. साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना गांधीवादी तत्त्वे, साधेपणा आणि सत्यनिष्ठा शिकविली. त्यांचा हा दृष्टीकोन आजही मूल्याधारित शिक्षणासाठी प्रेरणादायी आहे. साने गुरुजींनी १५० पुस्तके लिहिली. ज्यात कांदबर्‍या, कविता, निबंध,  चरित्रांचा समावेश आहे.आज मुले आणि पालकांमधील संवाद हरपला आहे. मुलांवर संस्कार करण्यासाठी व पालकांनी आपले मुल घडविण्यासाठी साने गुरुजींचे विचार वाचण्याची गरज असल्याचे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले. सूत्रसंचालन केतकी दळवी यांनी केले.
 
• वसंत व्याख्यानमालेत आज (बुधवारी) गौरीताई टिळक स्मृती व्याख्यानात ‘मेंदूचा पासवर्ड’ या विषयावर डॉ. श्रुती पानसे मार्गदर्शन करणार आहेत.  हे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता टिळक स्मारक येथे होईल.

Related Articles